कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे. यामध्ये आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि रोजगार यासारख्या योजनांचा समावेश होतो. या अनुषंगाने तसेच ध्वजदिन निधी, सैनिक बोर्डाकडे पाठविलेली अर्थिक मदतीची प्रकरणे, कोल्हापूर कार्यालयाकडून दिली गेलेली मदत व नागरी प्रशासनाकडील प्रकरणे बाबत जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी तहसिलदार विजय पवार, सदस्य सचिव तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल डॉ.भिमसेन चवदार (नि.), जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक या कार्यालयाचे प्रतिनिधी, मंडळाचे उपाध्यक्ष ले. कर्नल विलास मल्लू सुळकूडे (निवृत्त), अशासकीय सदस्य सुभेदार मेजर विलास शामराव पाटील (नि.), सुभेदार मेजर जितेंद्र शंकर खोत (नि.), हवलदार दशरत महादेव पाटील (नि.), हवलदार संजय शंकर माने (नि.), संजय अर्जुन पाटील (नि.), हवलदार दत्तात्रय परशुराम मोहिते (नि.), नायक केरबा मारुती पाटील (नि.) उपस्थित होते.
या बैठकीवेळी सदस्य सचिव तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.चवदार यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यात माजी सैनिक, विधवा, अवलंबित 20 हजार 456 असून वेगवेगळ्या युद्धात आत्तापर्यंत 181 जवान शहीद झाले आहेत. मागील वर्षी 2023 मध्ये इष्टांकाच्या 124 टक्के म्हणजेच एकुण 2 कोटी रूपये ध्वजदिन निधी संकलन झाले. सद्या 2024 चे निधी संकलन सुरू असून 1.80 कोटींचा इष्टांक आहे. यातील एप्रिल 2025 अखेर 94 लाख रुपये संकलन झाले आहे. उर्वरीत निधीही वेळेत संकलीत होईल असे त्यांनी सांगितले. वर्ष 2023-24 मध्ये कार्यालयाकडून 1757 अर्थिक मदतीची प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्डाकडे पाठविण्यात आली आहेत. याची एकुण किंमत 4 कोटी 8 लाख आहे.
जिल्हा कार्यालयामार्फत कल्याण निधी, विशेष निधी, दुसरे महायुद्ध अनुदान, मुख्यमंत्री सहायत्ता निधी व महाराष्ट्र गौरव पुरस्कार याकामी 4 कोटी 38 लाख रूपयांची मदत गेली आहे. या बैठकीत 34 नागरी प्रशासनाकडील प्रकरणांवर चर्चा झाली. यामध्ये 13 पोलीस तक्रारी, जमिनीबाबत 20 ग्रामपंचायत/नगरपालिका स्तरावरील 1 यांचा समावेश आहे. यावेळी बैठकीत सदस्यांमार्फत मिळालेल्या जमिनींकडे जाण्यासाठी रस्ते, तालुक्यात सैनिक कक्ष सुरू करणे, तालुकास्तरीय समिती कार्यरत करणे, जमिनीवरील अतिक्रमण काढणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शौर्य पदक मिळालेल्या जवानांचे फलक लावणे, जिल्हा नियोजन मधून निधी मिळणे, केंद्रीय विद्यालयासाठी पाठपुरावा करणे, गडहिंग्लज, आजरा व चंदगड साठी अतिरीक्त ईसीएचएस व सीएसडी कॅन्टीन उपलब्ध करून मिळावे याबाबत चर्चा झाली. यावेळी तहसिलदार विजय पवार यांनी प्रत्येक मागीणीबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून त्या त्या ठिकाणी सादर करण्याच्या सूचना केल्या