कोल्हापूर : एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. अशा या थोर व्यक्तींच्या विचारांची गरज आजच्या युवापिढीला असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीचे विचार येणाऱ्या पिढीत रुजावेत यासाठी कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन, सकल हिंदू समाज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या आणि अजरामर झालेल्या गीतांचा भरतनाट्यम नृत्यकलाविष्कार “तेजोमय तेजोनिधी” या कार्यक्रमाचे प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमातील नृत्यकलेस आणि खासकरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या सूत्रसंचालनास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची सुरवात राज्यनियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरानी रचलेल्या “हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “सागरा प्राण तळमळला”, “जयोस्तुते” अशा अनेक गीतांवर कलाकारांनी भरतनाट्यम नृत्यअविष्कार सादर केला यास प्रेक्षकांनी वन्स मोर ने दाद दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार, देशभक्तीचे कार्य, घेतलेले कष्ट याची आजही जाणीव होते. काळ्या पाण्याची शिक्षा, सुमुद्रात उडी अशा अनेक प्रसंगांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मातृभूमी प्रती असलेले प्रेम समजते. याच विचारांची आजच्या समाजाला गरज असून, प्रत्येकाच्या मनावर मातृभूमी बद्दलचे प्रेम, देशभक्ती बिंबवणे कलाची गरज आहे. याकरिता कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यामध्ये हॉल, ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय आणि वीर सावरकरांच्या आयुष्यातील प्रसंग दाखविणारे म्युरल अशा पद्धतीची व्यवस्था असणार असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप महेश जाधव, विश्वहिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, सावरकर संघटनेचे नितीन वाडीकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झाडे, संभाजी उर्फ बंडा साळुंखे, गजानन तोडकर, बाबा वाघापूरकर, शालनताई शेटे, रुपाराणी निकम, रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, शाम जोशी, राजू मेवेकरी, संतोष पंडित, गुळवणी, वंदूरकर जोशी आदी उपस्थित होते.