आचारसंहिता  लागण्यापूर्वी शासन निर्णयांचा धडाका

मुंबई: पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. 

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, आणि त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 269 शासन निर्णय जारी केले आहेत. 7 मार्च रोजी 173 शासन निर्णय, तर सहा मार्चला 96 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होऊ नयेत, आणि आठ नऊ आणि दहा मार्चला सलग सुट्ट्याचा विचार करून तातडीने सहा आणि सात मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय, राज्य उत्पादन शुल्का सारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना, कोकणातील काही योजनांना मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय यांचा समावेश यामध्ये आहे. आता यामध्ये सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतली जाण्याची अपेक्षा आहे.