ना.दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) : बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला केसरकर यांनी  प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. जनतेला विकास हवा असून अडीच वर्षाच्या कालावधीत काय विकास केला याचा लेखाजोखा तुम्ही मांडू शकत नसल्याची टीकाही केसरकर यांनी केली. सत्ताकाळात आलेल्या लोकांना न भेटणे, वाईट शब्दांमध्ये बोलणे, लोकांची कामे न करणे, या सगळ्या वागण्याचे लोकांनी तुम्हाला प्रायश्चित्त दिलं असल्याची बोचरी टीका केसरकरांनी केली आहे.

‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने ! सत्यमेव जयते! असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.