पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली. आ. सतेज पाटील यांचा तारांकित प्रश्न

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातीत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे ,असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत
उपस्थित केला. कोल्हापूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून हजारो हेक्टर शेती नापीक झाली आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी पंचगंगा नदीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने सादर केलेला २५२ कोटींचा प्रस्ताव शासनाने नामंजूर केला असून याबाबत जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नव्याने प्रस्ताव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय असल्यास पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उक्त प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत शासनस्तरावरुन कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषण निर्मुलनाबाबत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी हा स्वच्छ भारत मिशन , १५ व्या वित्त आयोगाचा निधी, जिल्हा नियोजन समिती आणि पर्यावरण विभाग या विभागांच्या तरतुदीमधून उपलब्ध करुन घेण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने दिनांक २४/०१/२०२४ आणि दिनांक २४/०२/२०२५ च्या पत्रान्वये कळविले असल्याचे सांगितले