स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिनी राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

माफी योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे. तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळं बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. दरम्यान, राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.