अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी पावणे दोनशे कोटी निधी द्या : आ. सतेज पाटील, हसन मुश्रीफ

कोल्हापूर : अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, महापालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी ५० कोटी, इचलकरंजी पालिकेसाठी २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी असा एकूण १७५ कोटीची निधी मिळावा, अशी मागणी माजी मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, या कामासाठी 25 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर हा धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रिडा क्षेत्राच्या दृष्टीने विकसनशील जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांबरोबरच औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी दररोज हजारो भाविक व पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यात एकूण 12 तालुक्यांचा समावेश असून बहुतांश तालुके हे डोंगराळ भागात मोडतात. सध्या अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, ग्रामीण मार्ग तसेच गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे येथील नागरीकांबरोबरच जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत असल्याने सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता रु.100 कोटीची निधीची आवश्यकता असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी रु. २५ कोटी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे सांगितले. तसेच, कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी, गगनबावडा अशा रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती यावेळी करण्यात आली या निवेदनावर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर, राजेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

त्याचबरोबर, कोल्हापूर महानगरपालिका ही ‘ड’ वर्ग महानगरपालिका आहे. कोल्हापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे उपनगरे, कॉलनी वस्त्यांमध्ये भर पडत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पहाता कोल्हापूर शहरातील उपनगरे कॉलनी वस्त्यांमध्ये नागरीकांना मुलभूत नागरी सुविधा व इतर विकास कामे पुरविणे महानगरपालिकेला अडचणीचे होत आहे. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून हे शहर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नुकतीच इचलकरंजी शहराला महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. अतिवृष्टीमुळे दोन्ही महापालिका क्षेत्रातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ता दुरुस्तीसाठी ५० कोटी तर इचलकारंजी पालिका अंतर्गत रस्त्यासाठी २५ कोटींचा निधी मिळावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शहरातील रस्ते डागडुजीसाठी तत्काळ पाच कोटी मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून तातडीने संपर्क साधला. गणेशोत्सवापूर्वी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.