राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे

मुंबई : राज्यपाल पदाच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीला कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची वेळ आहे. सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिद्ध केला, हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला आहे. ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, खाद्य संस्कृती आहे. तसा कोल्हापूरचा जोडा आहे. तोच कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. राज्यपाल पद हे मानाच पद असतं. त्या पदाचा मान राखणे हे त्या पदावरील व्यक्तीचे काम आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या नशिबी अशी लोक का आली असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.