वीज मंडळाचे साहेब आमच्या कुंकवाचे रक्षण करा

मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देत स्वाभिमानी महिला आघाडीची मागणी

कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा पाणी द्यावे यासाठी कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देऊन साहेब आमच्या कुंकवाचे रक्षण करा, अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली.

कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या सात दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने अधीक्षक अभियंता यांची सोमवारी भेट घेतली. यावेळीमहावितरण शेतीसाठी रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना विजेचा शॅाक लागून, गवा, बिबट्या, अस्वल, हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत.

यामुळे राज्यातील शेतक-यांच्या पत्नीचे मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, आमच्या भावना शासनाकडे पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्या सौ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, शेतक-यास रात्री अपरात्री पाणी पाजविण्यासाठी जावे लागते. राज्यात दररोज एका शेतक-याचा शॅाक अथवा वन्यप्राण्यांच्या हल्यात जीव जात आहे.

यामुळे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. यावेळी जि. प. सदस्या शुभांगी शिंदे , परितेच्या मा. पंचायत समिती सदस्या जयश्री पाटील, सौ. संगीता शेट्टी , सौ. सन्मती पाटील, सुवर्णा पाटील, वैशाली यांच्यासह निमशिरगाव , जयसिंगपूर , परिते , शिरोळ , हातकंणगले व करवीर तालुक्यांतील महिला उपस्थित होत्या.