साध्या यंत्रमागधारकांच्या वीज बिलात वाढून आलेला दंड रद्द करावा : यंत्रमागधारक जागृती संघटना

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : इचलकरंजी शहर व परिसरातील साध्या यंत्रमागधारकांना डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ ची वीज बिले वितरीत करणेत आली आहेत त्यात मंजूर जोडभारापेक्षा जादा भार वापरला म्हणून वीज बिलात MD वाढून आल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे.

परंतु याबाबत खुलासा असा की, वीज जोडणी करताना जे कपॅसीटर वापरण्यात आले होते ते खराब झाल्याने तसेच वायरिंगच्या किंवा अन्य तांत्रिक दोषामुळे यंत्रमागधारकांच्या मंजूर भारापेक्षा अधिक भार वापरत असल्याचे दिसते. याबाबतीत महावितरणने सर्व्हे करावा. प्रत्यक्षात मात्र यंत्रमागधारक मंजूर वीज भारापेक्षा जादा वीज वापरतच नाहीत. पण काही तांत्रिक दोषा मुळे वापर वाढला असेल तर आकारण्यात आलेला दंड रद्द करावा.

कारण ही अडचण जास्तीत जास्त साध्या यंत्रमागधारकांना आलेली आहे व अनेक यंत्रमागधारकांना अजूनही MD म्हणजे काय हे माहित नाही त्यामुळे निव्वळ वीज बिल वाढून आले आहे एवढेच त्यांना समजते काही यंत्रमागधारकांनी कपॅसीटर व अन्य दोष दूर केल्यानंतर त्यांचा वीज वापर मंजूर भारा एवढाच किंवा त्याहून कमी असल्याचे आढळून आले आहे. तरी एकूण परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने तांत्रिक त्रुटीने वीज बिलात आकारण्यात आलेली दंडाची रक्कम पूर्णपणे माफ करावी त्यांना कपॅसीटर व अन्य तांत्रिक बाबी तपासून पुन्हा MD वाढून येणार नाही यासाठी ३ महिन्याची मुदत द्यावी. साधे यंत्रमागधारक अगोदरच अडचणीत आहेत. जे प्रामाणिक यंत्रमागधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचे निवेदन महावितरण इचलकरंजी चे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना यंत्रमागधारक जागृती संघटनेकडून देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्या सह उपाध्यक्ष सुरज दुबे , प्रवीण कदम , सचिन कांबळे , भानुदास वीर , मोहन ढवळे , उमेश लाड , मनोज दाते , राहुल चिखलगे , शीतल डोंगरे , सचिन मांगलेकर , मारुती वीर , कपिल ढवळे यांच्या सह अनेक कारखानदार उपस्थित होते.