उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने  बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२१ मे) जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बारावीचा निकाल यंदा वाढला आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार याबाबत उत्सुकता आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.