“मुंबई-पुण्याची स्थिती आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल” : अजित पवार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध सुद्धा लावण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत.

यंदाच्या वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे 204 वा शौर्यदिन कार्यक्रम होतोय. यावेळी विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. लॉकडाऊनचे संकेत? राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत.

सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल. काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्कफोर्ससोबत बैठक घेतली. मुंबई, पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे.