मुंबई : पालघर जिल्ह्यातील मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी, डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय, तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा येथील उपजिल्हा रुग्णालय, सोंगटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्ण आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्याशी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चर्चा केली.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्याचा बारकाईने अभ्यास करून या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर येत्या सहा महिन्यात कार्यरत करण्यासाठी व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधीची कमतरता भासणार नाही तसेच पद मान्यता व कर्मचारी अधिकाऱ्यांची उपलब्धता करून देणार असून त्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे हि त्यांनी सांगितले.
पालघर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीचे काम समाधानकारकरित्या सुरू असून उपलब्ध झालेल्या वास्तूचा आरोग्य सेवेसाठी लवकरच वापरात आणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहील. या रुग्णालयाच्या कामासाठी तसेच रुग्ण खाटांची संख्या वाढवण्यासाठी जवळपास ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल.
पालघर जिल्ह्याला पुढील सहा महिन्यात चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळतील या दोन्ही प्रमुख रुग्णालय तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात तात्काळ विविध विभागांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य समस्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मागणी केल्या प्रमाणे निधी पुरविण्यात आला असून भविष्यात आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता भासणार नाही.
देशभरात सर्व ठिकाणी उपयुक्त ठरणारे आयुष्यमान कार्डधारकांची संख्या राज्यात २८ लाखांपेक्षा कमी आहे. १३०० आजारांवर उपचार करण्यास सर्वसामान्य नागरिकांना लाभदायी ठरणारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य कार्ड राज्यातील अनेक नागरिकांकडे असले तरी १९०० आजारांवर विनामूल्य उपचार देणारे आयुष्यमान कार्ड राज्यातील फक्त २७- २८ हजार नागरिकांकडे उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यात आयुष्यमान कार्ड धारकांची राज्यातील संख्या साडेतीन कोटी पर्यंत नेण्यासाठी मिशन मोडवर काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे अनेक नागरिकांना विविध आरोग्य विषयी लाभ सहजगत मिळतील.
गर्भवती महिलांना १०८ प्रणाली मधून इतर रुग्णालयात स्थलांतर करताना धावत्या रुग्णवाहिकेत झालेल्या प्रसूतींच्या प्रकारांची दखल घेऊन त्या सदर्भात राज्यभरात लेखापरीक्षण करणे व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले. या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आरोग्य विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उत्तेजनार्थ प्रोत्साहन भत्ता देण्याचे निश्चित झाले असताना कामचुकारपणा करणे, वेळ मारून नेण्याची प्रवृत्ती जोपासण्याची प्रवृत्ती असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गाना दिले.
तसेच विविध आरोग्य संस्थांमध्ये असणाऱ्या १०२ प्रणालीच्या रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल रुग्णांच्या वाहतुकीसोबत अपघात व इतर गंभीर रुग्णांना संदर्भीय सेवा देण्यासाठी वापरात आणाव्या अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल गरात, उपनेत्या ज्योती मेहेरे,अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नंदापुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक रामदास मराड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश सुरडकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.