डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते दुर्गेवाडीतील बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कुंभोज ( विनोद शिंगे)
दुर्गेवाडी ता. हातकणंगले येथील पूर्ण झालेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तत्पूर्वी विहारात शांततेच प्रतीक असणारे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना देखील करण्यात आली असून त्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

 

 

यावेळी डॉ. मिणचेकर बोलताना म्हणाले, भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला आणि समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करून अनेक लोक केवळ त्यांच्या जीवनातच यशस्वी झाले नाहीत तर त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. भारत ही बौद्ध धर्माची मूळभूमी आहे. बौद्ध धर्माचा भारत देशा बरोबर बाहेरील देशात ही मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला आहे. विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला तसेच भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करण्याचे काम केले. तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी पुढाकार घेतला.कामगाराच्या साठी ८ तास कामांची मंजुरी, महिलांना प्रसूती सुट्ट्या संविधानात नमूद केल्या, मुलींना शिक्षणाचा अधिकार,आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिला आहे असे अनेक लोक हिताचे कायदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मा.अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, सरपंच सचिन घोलप,संदीप घोलप, राहूल घोलप, दिपक कोळी,विनोद शिंगे,सुरेश भगत, मिसाळ, राजु मूजावर, व इतर समस्त घोलप कुटुंबीय व दुर्गेवाडी व परिसरातील समस्त बौद्ध समाज उपस्थित होते.