कोल्हापूर:शासनाच्या योजना प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी सुरू केलेला “एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!” हा अभिनव उपक्रम सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात गडहिंग्लज तालुक्यातून झाली असून पहिल्याच दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनासमोर थेट समस्या मांडल्या.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न या दौऱ्यात पाहायला मिळाला. त्यामुळे प्रशासनात सकारात्मक हालचाल निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “अधिकारी गावात, प्रशासन दारात आणि विकास थेट जनतेपर्यंत” या संकल्पनेचा प्रत्यय या दौऱ्यातून नागरिकांना आला.
दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी कृषी विभागाकडे गावांमध्ये वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नसबंदी मोहीम राबवण्याची मागणी केली. डीआरडीए विभागाकडे घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच सोलर जोडणी योजनांमध्ये प्रशासनाने अधिक सहकार्य करावे, अशी अपेक्षाहीनागरिकांनी व्यक्त केली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवून कचरा उठाव नियमित व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर प्रकल्प संचालिका माधुरी परीट यांनी कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध व नियमित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बैठकीत नदी प्रदूषणाचा प्रश्नही जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. गावांतील नद्यांचे प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होताच मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी मांडला. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. प्रत्येक गावाला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी मिळावा आणि रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा प्रत्यक्ष लाभ बचत गटांना मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर पंचायतपंचायत समिती स्तरावर तसेच कॅन्टीन व्यवस्थेमधून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षा शिल्पा खोत यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने आणि तत्परतेने सोडवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या धडाकेबाज आणि लोकोभिमुख दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास वाढताना दिसत आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील या यशस्वी प्रारंभानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या उपक्रमाकडे लागले असून ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
