महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय : शरद पवार

लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. आता लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे उरले आहेत. त्यानंतर 4 जूनला मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल लागणार आहेत. महाराष्ट्राचा निकाल काय लागणार? त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतमोजणीपूर्वीच एक सूचक वक्तव्य केले आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. कारण या ठिकाणी शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात  निवडणूक होत आहे. पवार कुटुंबातच ही लढत झाल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय होईल. राज्यातील जनता भाजपप्रणित एनडीएला धडा शिकवेल’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवरही भूमिका मांडली. ‘आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडीने एकत्र लढावी, अशी आपली इच्छा आहे. विधानसभेला 288 जागा आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल’, असे शरद पवार म्हणाले.

बारामतीत विजयाची खात्री आहे का? असा प्रश्न मुलाखतीत शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं. ‘बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच झाला नाही. पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात. त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही’, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.