लोकसभेत भाजपला जागा कमी पडल्या तरी युती करणार नाही : शरद पवार

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील  सर्व टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 4 जूनला येणाऱ्या निवडणूक निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येतंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला जर सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती अजिबातच करणार नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. 

शरद पवार म्हणाले की, “त्यांनी सुरुवातीला 400 पारचा नारा दिला, पुन्हा पुन्हा ते सांगत होते. त्यानंतर ते 390 वर आले, 350 वर आले… याचाच अर्थ तो ट्रेंड खाली येतोय आणि जे 400 पार असं बोलत होते, तेदेखील आता जरा जपून शब्द वापरायला लागलेत. त्यामुळे आता ट्रेंड असा दिसतोय की, त्यांचं बहुमत कमी होतंय. त्यामुळे मागची स्थिती आणि आजच्या स्थितीत काही सुधारणा नाही, सर्व काही तसंच आहे. त्यामुळे आताचा ट्रेंड भाजपच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढणार आहेत. मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढतील. विशेषतः केजरीवालांचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, ते पाहिलं तर त्यांचा नंबर नक्की वाढेल. एकंदरीत संपूर्ण देशाचा विचार केला तर 400 पार तर सोडाच, पण सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा नंबर कुठपर्यंत ते गाठू शकतात, हे सांगणं तसं कठीण आहे.”

शरद पवार म्हणाले की, “भाजपसोबत कोणते पक्ष जातील, हे काही सांगता येत नाही. अशी परिस्थिती जर आली, तर माझ्यासारखे काही लोक कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आणि देशाला स्थिर सरकार देण्यासाठी जर संधी असेल, तर त्याचा पुरेपुर फायदा घेतील.”

जर भाजपला जागा कमी पडल्या तर ते पुन्हा ठाकरेंना साद घालू शकतात, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजिबात शक्य नाही.  उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत. तसेच, पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी युती करणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. भाजपची धोरणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशा परिस्थितीत युतीचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले. वैयक्तिक संबंध आणि राजकीय निर्णय यात फरक असतो, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

देशात आता लोकांना बदल हवाय, देशात आता अजिबातच मोदी लाट नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा शरद पवारांनी देशात मोदी लाट नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार म्हणाले की, “विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा शरद पवारांनी केला आहे.