उंचगाव येथील माळीवाडा पुलाची लांबी,रुंदी व उंची वाढवली नाही तर उंचगाव हद्दीतील हायवेचे काम बंद पाडू…

कोल्हापूर: पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहापदरीकरण होत असताना उंचगाव येथील माळीवाडा पुलाची लांबी,रुंदी व उंची वाढवा. मागील विस्तारीकरणातील चुका आता जर करत असाल तर जनआंदोलन उभारू.असा इशारा करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), उंचगाव मधील समस्त शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आला.

२००२ साली या महामार्गाचे काम दोनपदरी झाले. २०१२ ला चारपदरी व आता २०२३ ला साताऱ्यापासून ते कागलपर्यंत रस्त्याचे सहापदरीकरण अर्थात विस्तारीकरण सुरू आहे. यापूर्वी चारपदरी करणावेळी उंचगाव व तावडे हॉटेल रस्त्याच्या पुलाची उंची कमी ठेवल्याने उंचगावकरांना तावडे हॉटेलपासून शेतामध्ये जाण्यासाठी किंवा मणेरमाळाकडे मुख्य महामार्ग ओलांडून पुलाखालून जात असताना दोन्हीही पुलाखाली दिवसातून चारचार वेळा वाहतुकीची मोठी कोंडी होत राहिली.

उचगाव हे कष्टकरी, कामगार वर्ग, नोकर वर्ग अशी गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंतची संमिश्र वस्ती असलेले गाव आहे. आजपर्यंत वाहतुकीच्या कोंडीचा या सर्वांनी नाहक त्रास सहन केला. गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. नवीन सहा पदरीकरणात हा त्रास उचगावकर सहन करू शकणार नाहीत. ज्या चुका पूर्वी विस्तारीकरणावेळी झाल्या त्या आता आम्ही होऊ देणार नाही.

पूर्वीच्या चुकांच्या वेदना १० ते १५ वर्ष उंचगावकर सहन करत आहेत. आता सहापदरीकरण करताना माळीवाडा पुलाची उंची व रूंदी वाढवण्याबाबत संबंधित प्रशासन उदासीन असुन त्या पुलाची उंची वाढवणार नसल्याचे समजते. एकतर संपूर्ण रस्ता उंचगावमधून जात असल्याने प्रामुख्याने उंचगावच्या ५० ते ६० हजार लोकवस्तीच्या गावातील माळीवाडा पूल ज्या पूलापलीकडे शेकडो एकर शेती व त्या शेतामध्ये जाणारा शेकडो शेतकरी, कष्टकरी वर्ग आपल्या मालाची ने-आण कशी करतील? शेतकऱ्यांचे मुख्य पीक ऊस आहे. माळीवाडा पुलाखालून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात नाही. उंचगावमधील गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी गणेश विसर्जनासाठी जाणारी गणेश मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्या पुलाखालून जात नाही.

आताची ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात का आली नाही? एवढा मोठा रस्ता सहापदरीकरण करत असताना उंचगावकरांवर अन्याय कशासाठी पूर्वी झालेल्या चुकांमुळे तावडे हॉटेल व गोल्डस्टार पुलाच्या कमी उंचीमुळे उंचगावकरांना रोजच्या होणाऱ्या त्रासापासून किमान आता सहापदरीकरणाला तर न्याय मिळेल असे वाटत होते. पण काही चुकीच्या धोरणामुळे उंचगावातील माळीवाडा पुलाची उंची वाढविणार नसाल तर आम्ही करवीर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व उंचगावमधील नागरिकांना घेऊन लोक आंदोलन उभारून संपूर्ण उंचगावातून जाणारा रस्ता करू न देण्याचा इशारा देत आहे. प्रशासनाने याची नोंद घ्यावी व माळीवाडा पुलाची उंची वाढविण्याबाबत ठोस ठोस निर्णय घ्यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास आपले खाते जबाबदार असेल.

या मागणीचे निवेदन मा.गोविंद बैरवा,उपव्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व इंजिनिअर मा.सी.बी. भरडे यांना करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), उंचगाव मधील समस्त शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम करत असताना उंचगाव मध्ये पुलाची रुंदी व उंची वाढवली नाही तर उंचगाव मध्ये हायवेचे काम थांबवले जाईल व येत्या आठ दिवसात उंचगावमधील शेतकरी व ग्रामस्थ जनआंदोलन सुरू करतील. असा इशारा शिष्टमंडळाने दिला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, सुनील चौगुले,योगेश लोहार, विराग करी, वैभव पाटील, संजय चौगुले, भूषण कदम, सूरज पाटील, संतोष पाटील, आनंदा माने, चंदर जाखले, नारायण मनाडे, अवि मोळे, काका पाटील, केरबा माने, कैलास जाधव, शरद माळी, अजित चव्हाण, सचिन नागटीळक, दत्ता यादव, बाळासो मनाडे, विश्वास यादव, शफीक देवळे, पांडू भोसले, राजू संकपाळ, दत्ता फराकटे, मंगू वळकुंजे, धनाजी पाटील, परशुराम म्हाकवे, सुधीर जाखले, सोमनाथ तोडकर, अजित पाटील आदींसह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.