राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले व त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे

शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणांचा सातत्याने विरोध करत असल्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा काढली यामागे एक राजकीय षडयंत्र आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.

राज्यात गुंतवणूक, प्रकल्प, रोजगार, शेतकरी आत्महत्या या व अशा अनेक विषयांवर अपयशी ठरलेले शिंदेसरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सुरक्षा काढली म्हणून भीतीपोटी आम्ही घरी बसू व सरकारचा विरोध करणे थांबवू असा कदाचित गोड गैरसमज मुख्यमंत्र्यांचा असावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सुरक्षा काढली तरी अधिक ताकदीने राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करतील व त्याची प्रचिती या सरकारला लवकरच येईल, असा इशाराही त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे. तसेच ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविली जाईल, असेही ते म्हणाले.