तळसंदे परिसरात होणार रबर लागवड; डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ राबवणार प्रयोग


तळसंदे (वार्ताहर) : कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने तळसंदे परिसरात रबर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. रबर रिसर्च इंस्टीटयूट ऑफ इंडियाच्या (आरआरआयआय) सहकार्याने विद्यापीठ व नजीकच्या परिसरात रबर रोपांची लागवड केली जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्याना आर्थिक स्थैर्य देणारा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व भारत सरकारच्या रबर बोर्डचे कार्यकारी संचालक डॉ. के. एन. राघवन यांनी सांगितले.

केरळ, तामिळनाडू व ईशान्येकडील राज्यामध्ये रबराचे मोठ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत. या राज्यांच्या अर्थव्यवस्थेत रबर उत्पादनात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातही सिंधुदुर्गच्या काही भागात रबर लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर विभागात रबर लागवडीचा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी डी. वय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून कोट्टायम येथील रबर रिसर्च इंस्टीटयूट ऑफ इंडियासोबत रबर लागवडीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. रबर बोर्डाचे कार्यकारी संचालक डॉ. के. एन. राघवन आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. जेसी एम.डी. व कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही संस्थांमधील हा करार पाच वर्षासाठी असून परस्पर सहमतीने त्यात वाढ करता येईल आहे. विद्यापीठ परिसरात लागवड केल्या जाणाऱ्या रबर रोपासाठीचे सर्व तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य ‘आरआरआयआय’ करणार आहे.

यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, फार्म हेड ए. बी. गाताडे, पी. एस. पाटील, डॉ. बाबासाहेब उलपे आदी उपस्थित होते. डॉ. के. एन. राघवन, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. जेसी एम.डी. व मान्यवरांच्या हस्ते रबरच्या रोपांची लागवड करण्यात आली. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत करून विद्यापीठ व रबर लागवड प्रकल्प याबाबतची माहिती दिली.

कृषी व उद्योगाला चालना मिळेल: डॉ. पाटील
कृषी क्षेत्राशी निगडीत संशोधन व विविध प्रयोग यांच्या माध्यमातून शेतकऱ्याना मदत व मार्गदर्शन यासाठी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ नेहमीच कार्यरत आहे. कोल्हापुरात रबर लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्याना नवा आर्थिक पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरआरआयआयच्या सहकार्याने रबर लागवडीचा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल. रबर उद्योगातही कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आघाडीवर राहावे असा आमचा प्रयत्न राहील. कोल्हापुरात रबर लागवड यशस्वी झाल्यास शेतकर्‍यांना तर फायदा होईलच त्याचबरोबर अनेक प्रक्रिया उद्योगही उभे राहतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी केले.

शेतकरी समृद्ध होईल – डॉ. राघवन
डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांच्या माध्यमातून डॉ. संजय डी. पाटील कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला विद्यापीठाचा कॅम्पस त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत आहे. कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम डॉ. पाटील करत असून रबर लागवड हा याच प्रयत्नांचा पुढील भाग आहे. रबराच्या १० विविध जाती असून ४० हजाराहून अधिक उत्पादने तयार केली जातात. येथील वातवरण रबर लागवडीसाठी पोषक आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येईल असे डॉ. राघवन यांनी सांगितले.