केडीसीसीकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उद्योग, व्यवसायाना अर्थसहाय्य : हसन मुश्रीफ

  कागल : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जात असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील हजारो बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही ते म्हणाले.

कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले,  मराठा समाजासह ओबीसी, कुणबी, मागास व भटक्या समाजाच्या बेरोजगार तरुणांनाही उद्योगधंदे व व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. या सर्व योजनांमधून अर्थ पुरवठा करण्यासाठी बँक सज्ज आहे. शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत पिककर्ज बिनव्याजी देणारी  देशातील ही पहिली व एकमेव बँक आहे, असे सांगतानाच ते म्हणाले, शेतीची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या साखर कारखान्यांच्या पाठीशीही बँक हिमालयासारखी उभी आहे.

प्रास्ताविकपर भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी आहे. समाजात बेरोजगारी वाढत असताना बँकेने बेरोजगारांसाठी केलेला हा कर्जपुरवठा एक आशेचा नवा किरण आहे.  

स्वागत बँकेचे कागल तालुका विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी केले. आभार म्हाकवेचे माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी मानले.

दूध धंद्यासाठी ५०० कोटी…

मंत्री मुश्रीफम्हणाले,  बँकेच्यावतीने सर्व प्रकारचा कर्जपुरवठा सुरू आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून हजारो बेरोजगार तरुणांना अर्थपुरवठा झाला आहे. तसेच,  महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,  इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ या योजनांमधूनही जोपर्यंत सरकार या योजनेचे व्याज देत राहील तोपर्यंत तब्बल ५०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्याचीही बँकेची तयारी आहे.