आपलं काम भलं, आपण भलं….अजित पवार

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीरांना टोला लगावला आहे. सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे हे मी कितीवेळा सांगितलं आहे. आमच्याबद्दल बरेच काही बोललं जातं. काही वाचाळवीर बोलत असतात. पण मी त्यांच्याबद्दल काही बोललो का? आपलं काम भलं आणि आपण भलं. ही आपली संस्कृती नाहीये. दोन्ही बाजुंनी हे थांबलं पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी वाचाळवीरांना लगावला.

अजित पवार हे पुण्यात मीडियाशी बोलत होते. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्यात. सरकार येत असतात, जात असतात. शरद पवार यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे एकत्रं आहेत तोपर्यंत सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं. मी ठरवून तळजाईवर आलो. लोकांना भेटलो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मला इथे कामं बघायची होती, असंही पवार म्हणाले

यावेळी अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवरही भाष्य केलं. पहाटे कोण ट्विट करत आणि सकाळी साडे सहाला टीम तेथे जाते. काही लोक ट्विट करून माहिती कशी देऊ शकतात. यावरूनच तुम्ही समजून घ्या नेमकं काय सुरू आहे ते. आघाडीचं सरकार आल्यापासून विरोधकांचं सुरुवातीपासूनच कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. द्वेष भावनेतून कसं वागायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. काल देखील एका ठिकाणी कारवाई झाली. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मी माझं काम करत राहणार. आपलं काम भलं, आपण भलं. दोन्हीकडून होणारे आरोप बंद झाले पाहिजे. या प्रकरणावर शरद पवार बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बोलले आहेत. नवाब मलिकांनी त्यांची बाजू यापूर्वीच मांडली आहे. तरीही त्यांना अटक झाली. यातून आता जनतेनंच बोध घ्यावा. सुडाचं राजकारण कुठपर्यंत करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.