फळांच्या राज्याला कोल्हापुरात विक्रमी दर

कोल्हापूर : आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे.यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती. आता वातावरण निवळले असून हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले असून मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 5 डझनाच्या पेटीला तब्बल 40 हजार 599 असा दर मिळालेला आहे.

अर्थात एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला 676 रुपये मोजावे लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा देवगडचा हापूस बाजारात उशिराने दाखल होत आहे. मात्र, खवय्यांना त्याचीच प्रतिक्षा असून दराचा विचार न करता खरेदी केली जात आहे.

कोल्हापूरात कोकणासह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होत असते. कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण यासह किनारपट्टीच्या भागातून आवक होत असते. दरवर्षी कोल्हापूरातील खवय्येगिरींना हापूसच्या आगमानाची मोठी उत्सुकता असते. रत्नागिरी हापूस आंबा आकाराने लहान असला तरी त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम असल्याने ग्राहकांना त्याची प्रतिक्षा असते. यंदा पहिल्या टप्प्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात आगमन झाले आहे.