कळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहन

कोल्हापूरकळंबा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तलावाची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तलावातील गाळ मातीचा उपसा करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

 

 

इच्छुक शेतकऱ्यांनी जल अभियंता कार्यालयाकडे रितसर अर्ज सादर करून मंजुरी घेतल्यानंतर तलावातील गाळमाती विनामूल्य व स्वखर्चाने उपसा करून नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपसा केलेल्या गाळाची दैनंदिन नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडे करणे बंधनकारक राहणार आहे.

 

गाळमातीचा उपसा करताना मुरुमापर्यंत खोदकाम न करता मुरुमावरील किमान दोन फूट मातीचा थर कायम ठेवणे आवश्यक आहे. तसेच जागोजागी खड्डे न खोदता समांतर पद्धतीने आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निश्चित करून दिलेल्या जागेतच गाळ उपसा करावा लागणार आहे.

 

उपसा करण्यात आलेल्या गाळमातीची दररोज एक खेप महापालिकेने सूचित केलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यानात टाकणे आवश्यक असून त्याची नोंद कार्यालयातील नोंदवहीत करावी लागेल. गाळ उपशाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

 

महापालिकेने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून, कोणतेही बेकायदेशीर वर्तन अथवा अटींचा भंग आढळून आल्यास संबंधितांची परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

 

तरी स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत तलावाची साठवण क्षमता वाढविण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

🤙 8080365706