जाहिरातीचा नवीन फंडा…. खिळे ठोकून झाडांना देतात मरण यातना

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील झाडांची फांदी तोडणेही गुन्हा आहे; पण जाहिरातीचा नवीन फंडा या झाडांसाठी मरणयातना देत आहे.

ही केवळ वन विभागाचीच जबाबदारी आहे असे म्हणून चालणार नाही. हा विपुल साठा जतन करणे आपलेही कर्तव्य आहे; पण आपल्या प्रगतीच्या हव्यासापोटी येथील विपुल संपत्तीचा ऱ्हास होत आहे.शेतकऱ्यांना मात्र या ना त्या कारणासाठी हेच वन्यजीव विभाग वेठीस धरतात; पण या हॉटेल व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, कॉम्पुटर क्लास, सैनिक भरती अकॅडमी यांचा या जाहिरातींमध्ये जास्त भरणा आहे. माणसाला जशी दुखापत होते, वेदना होते, त्याचप्रमाणे झाडांनाही वेदना होतात. याच वेदना झाडांना देण्याचे काम माणूस करीत आहे. वन्यजीव विभाग या सर्वांवर कारवाई का करत नाही हा खरा प्रश्न पर्यावरणप्रेमींमध्ये आहे.निपाणी-देवगड हा राज्यमार्ग राधानगरी अभयारण्यातून जातो. तसेच राधानगरी जलाशय, राऊतवाडी धबधबा, काळम्मावाडी धरण या परिसरातील बहुतांशी झाडांवर या वेगवेगळ्या जाहिराती खिळे ठोकून अडकवलेल्या दिसतात. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. कोणताही विचार न करता प्रत्येक झाडावर ३-४ जाहिरातींचे फलक अडकविण्यात आले आहेत. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या आर्किड असलेल्या झाडांवरही खिळे ठोकून जाहिरात करण्यात आली आहे. शंभर वर्षांपेक्षा जुनी असलेली ही वृक्षसंपदा यामुळे नष्ट होत आहे. कोणताही विचार न करता पोस्टरबाजीसाठी मोठमोठे खिळे या झाडांवर ठोकले जात आहेत. वनविभागाच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडत आहे.