कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून निधीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठात मंत्री श्री देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन कामकाजाच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीसाठी कुलगुरू डॉ.राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात झाले.त्यांचे व्यक्तीमत्त्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी,या दृष्टीने विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान वीस महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा,व्याख्याने आदींचे आयोजन व्यापक पातळीवर करावे.तसेच ग्रामीण,शहरी अशा सर्वच स्तरांतील युवकांपर्यंत स्वर्गीय देसाई यांच्या भरीव कार्याची माहिती पोहोचविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत समाजमाध्यमांद्वारेही माहिती घ्यावी अशी सुचना केली. त्याखेरीज विद्यापीठाने लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव तयार करून त्वरीत शासनाकडे पाठवावा. यासाठी लागणाऱ्या आवश्यक पदांचा प्रस्तावही सादर करावा.
प्रारंभी अध्यासनाचे प्रमुख डॉ.अवनीश पाटील यांनी स्वागत करून अध्यासनाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. या बैठकीला डॉ. व्ही.जी. पानस्कर, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉ. दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉ. माया देसाई, डॉ. सोनल मंगल, संदीप केसरकर, डॉ. उमाकांत हत्तीकट आदी उपस्थित होते.
