कोल्हापूर : कोल्हापूरला दक्षिण काशी समजले जाते.या शहराला अध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व आहेच तथापि पर्यटनाच्या बाबतीत या शहराला देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन पर्यटन,खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात श्री देसाई यांनी पर्यटन व खनिकर्म विभागाचा आढावा आज घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कोल्हापूरला निसर्गाने भरभरून दान दिले आहे.नैसर्गिक परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळू शकेल या विश्वासानेच MTDC मार्फत श्री क्षेत्र ज्योतिबा ,पन्हाळा व दाजीपूर अभयारण्याच्या ठिकाणी व्ही व्हीआयपी ते सामान्य नागरिकांना परवडेल अशा स्वरूपात रिसॉर्ट,कॉटेज उभारणीचे काम हाती घेतले आहे. हे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्यात यावे .पन्हाळ्यावरील रिकाम्या जागेत चांगला लँडस्केपवाला पाहून ती रिकामी जागाही विकसित करण्यात यावी. हे काम लवकर पूर्ण झाले तर कोल्हापूरचे पर्यटन निश्चितपणाने वाढेल. सध्या पन्हाळा येथे पहिल्या टप्प्याचे काम सुरु असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तात्काळ करण्यात यावे.यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही अशी ग्वाही श्री देसाई यांनी यावेळी दिली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात मायनिंग कुठे वाढवता येईल ? याची विचारणाही मंत्री महोदयांनी यावेळी केली.
क – वर्ग पर्यटन स्थळांच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सांगताना जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले की , या अंतर्गत जिल्ह्यात एकूण 322 कामे मंजूर असून यासाठी प्रमुख 12 यंत्रणा कार्यान्वित आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ 2 माईन्स सुरू आहेत तसेच बावन गुण खनिजाचे खानपट्टे मंजूर असल्याची माहिती जिल्हा खनीकर्म अधिकारी अजित पाटील यांनी या बैठकीत दिली.
या आढावा बैठकीसाठी महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी , करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड , जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे पर्यटन विभागाचे उपसंचालक (पुणे) भारत लांघी ,हनुमंत हेडे ,पन्हाळा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
