कागल :राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के फी सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए, पॉलिटेक्निकसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना हा निर्णय लागू करण्यात आला. आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे.
मात्र काही महाविद्यालयांकडून विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क आदी विविध नावाखाली विद्यार्थिनींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कायद्यानुसार सर्व अतिरिक्त शुल्क ‘मुख्य शुल्क’ या एकाच शीर्षकाखाली समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पात्र मुलींना प्रत्यक्षात १०० टक्के फी सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो पालकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांनी मराठा समाजासाठी मंत्री पाटील यांनी केलेल्या विविध कामांचाही उल्लेख केला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी मराठा समाजातील युवकांना शिक्षण, रोजगार, उद्योग व आर्थिक स्थैर्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पुढे आणले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत युवकांसाठी कर्ज मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. मराठा विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सवलतींची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच महामंडळासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नुकताच २०२६ मध्ये महामंडळासाठी १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजे समरजितसिंह घाटगे यांचा कोट :
“मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेला १०० टक्के फी सवलतीचा निर्णय हा सामाजिक परिवर्तन घडवणारा आणि पालकांना दिलासा देणारा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जनकल्याणकारी विचारांचा वारसा जपत मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.तसेच मराठा समाजातील युवकांना शिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत. समाजहिताच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.
