मुंबई– बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर- कागलदरम्यान कागलच्या लक्ष्मी टेकडीपासून पुढे कागल शहर व महाराष्ट्र राज्य हद्दीपर्यंत एलिवेटेड कॉरिडॉर मंजूर झाला आहे. हा सहापदरी स्वतंत्र कॉरिडॉर होणार असून त्यासाठी तब्बल 358 कोटी निधीही मंजूर झाला आहे. यासाठी माझ्यासह कागलमधील श्री. प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय महामार्ग कृती समितीने विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता.

याबद्दल केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. उद्याच रविवारी दि. १५ मुख्यमंत्री श्री. फडणवीससाहेब कागलमध्ये येत आहेत. कागलमध्ये येण्याआधीच त्यांनी कागल शहरासह परिसराला आणि एकूणच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलेली ही फार मोठी भेट आहे. हा राष्ट्रीय महामार्ग दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा आहे. या सहापदरी एलिवेटेड कॉरिडोरमुळे प्रवाशांची वेळ आणि वाहतूक कोंडीमुळे इंधनावर होणारा खर्च तर वाचेलच. तसेच; प्रदूषण कमी होण्यासाठी फार मोठी मदत होईल.
