कोल्हापूर:महिलांनी स्वतःचा उद्योग- व्यवसाय सुरू करावा. त्यांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी भागीरथी संस्था निश्चितच पाठबळ देईल. शासनाच्या अनेक अर्थसहाय्य करणार्या योजना आहेत. त्यांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच, भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. त्याचा लाभ घेवून महिलांनी उद्योगशिल बनावे, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कौशल्यातून स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरण या विषयावर झालेल्या कार्यशाळेला, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, माया देसाई, डॉ. डी आर इंगवले, डॉ. सोनल मंगल यांची उपस्थिती होती. प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनप्रवासाबाबत माया देसाई यांनी माहिती दिली. तर महिलांचे स्वावलंबन आणि सक्षमीकरण, याबाबत सौ. अरूंधती महाडिक यांनी मार्गदर्शन केले. महिलांकडे उपजत नियोजन कौशल्य असते. काटकसर, चिकाटी, संयम, व्यवस्थापन कौशल्य या गुणांचा वापर उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी करावा. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य, भागीरथी पतसंस्था करेल. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उद्योगांसाठी अनुदान योजना आहेत. त्याचा लाभ घेवून महिलांनी उद्योजिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे आवाहन सौ. महाडिक यांनी केले. प्रशिक्षीका सुजाता नाईक यांनी, महिलांना विविध प्रकारच्या बॅगा आणि पर्स तयार करण्याचं प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत सहभागी महिलांकडून अशा वस्तू बनवून घेण्यात आल्या. या कार्यशाळेला शरयू भोसले यांच्यासह भागीरथी संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या.
