महावितरण विभागातील विविध प्रलंबित कामांबाबत ऊर्जा दरबार

कोल्हापूर : महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा नागरिकांचे महावितरण विभागातील विविध प्रलंबित कामांबाबत ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या. यामध्ये नवीन जोडणी, बिल दुरुस्ती, शेती कनेक्शन आदी विषयांबाबत वीज ग्राहकांचे प्रश्न वा शंकांचे निरसन तात्काळ करा. याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना यामध्ये सामावून घेऊन गतीने कामे पूर्ण करा व केलेल्या कामाचा अहवाल सादर करा, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

भविष्यात टीओडी मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे वीज दरात फायदा होणार आहे. वीज अपघात, जळीत प्रकरणात पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या, वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा, असे आदेश दिले.
पूर बाधित क्षेत्रातील कृषी वीज जोडणी व ७.५ एचपी वरील शेतकऱ्यांना वीजबिल माफी याकरता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विद्युत निरीक्षक शकील सुतार, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, डॉ. निता माने, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उप विभागीय अभियंते, विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545