कोल्हापूर : करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांचे समवेत आ. चंद्रदीप नरके यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत सोयाबीन,भुईमुग,भात, नाचणी आदि पिकाची बियाणे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात त्या बाबींचा अवलंब करण्यासंदर्भात चर्चा झाली.तसेच कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत गाव निवडीबाबतदेखील चर्चा झाली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्र प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा झाली.
बैठकीला करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील,पन्हाळा तालुका कृषी अधिकारी श्रीमती काव्यश्री घोलप, गगनबावडा तालुका कृषी अधिकारी आर.बी. गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक(आत्मा) चे पराग परीट, सुंदर माने, निखिल कुलकर्णी,विश्वजीत पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.