गोरगरिबांचा आजन्म सेवक म्हणून काम करीत राहू : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : अनेकांनी कटकारस्थानाने माझी नौका भर समुद्रातच बुडवण्याचे प्रयत्न केले. परंतु; माझी ही नौका समुद्रातून अलगद उचलून बाहेर काढण्याची ताकद गोरगरिबांच्या आशीर्वादात आहे. त्याची प्रचितीही मला आली आहे. आजवरची वाटचाल गोरगरिबांच्या आशीर्वादाच्या शिदोरीवरच यशस्वीरित्या चालत आलो. यापुढेही गोरगरिबांचा आजन्म सेवक आणि हमाल म्हणून काम करीत राहू.असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले .

ते कागलमध्ये संजय गांधी निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या अशा ९५० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरिबांची सेवा हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे. त्या भावनेतूनच विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच गोरगरिबांच्या योजनांमध्ये आमुलाग्र बदल केले. ६५ वर्षावरील वृद्ध आई-वडिलांना पेन्शन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
कागल तालुका संजय निराधार गांधी निराधार समितीचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. सुरुवातीला मासिक साठ रुपये अनुदान होते. त्यानंतर १८० रुपये, दोनशे रुपये, सहाशे रुपये असे करीत ते दीड हजार करण्यात यश मिळाले. कोणत्याही परिस्थितीत लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी, उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकात्वाची वयाची अट ६५ वरून ६० करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे काम तर उत्कृष्ट आहेच. तसेच; तहसीलदार अमरदीप वाकडे आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांनीही अत्यंत मनापासून काम केले आहे. या सर्वांना गोरगरिबांचे आशीर्वाद मिळतील.
या कार्यक्रमास कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, सदाशिव तुकान, तानाजी कुरणे, राजू आमते, नामदेव मांगले, अंकुश पाटील, साताप्पा कांबळे, सौ. पूनम महाडिक, शिवाजी मगदूम, दशरथ हजारे, प्रवीण सोनुले, सुदाम देसाई, विकास पाटील, आर. व्ही. पाटील, तुकाराम देसाई, जोती मुसळे, संजय चितारी, नितीन दिंडे, सुनील माळी, संजय ठाणेकर, सर्जेराव अवघडे, पांडुरंग साळोखे, आदी प्रमुखांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत शशिकांत खोत यांनी केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आभार मानले.

🤙 9921334545