मोदी 400 पार कसे जातात ते बघतोच ; उद्धव ठाकरे यांचे थेट भाजपला आव्हान

मुंबई: ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सध्या कुटुंब संवाद यात्रा सुरु आहे.यामधून उद्धव ठाकरे हे सर्व विधानसभा मतदार संघामध्ये भेट देणार आहेत. आज पोलादपूर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा देखील पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह (BJP) शिंदे गटाचा  खरपूस समाचार घेतला. ‘मतदारराजा जागा रहा. रात्र वैऱ्याची आहे. आता झोपी गेलास तर दिवस सुद्धा वैऱ्याची येईल’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. तर मोदी 400 पार कसे जातात हे बघतोच, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाच्या प्रचाराला मीच आलो होतो. यांना (नरेंद्र मोदी) पंतप्रधान करा असं मीच सांगितलं होतं. आताही मीच आलोय. कारण आता आपल्याला हुकुमशाही नको. या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळी तुडवली आहे. भर दिवसा घटनेचा मुडदा पाडला जातोय. प्रत्येकावर दबाव आणत आहेत. जे जे विरोधी पक्षात आहेत, विरोध करतायत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांना आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे असं सांगितलं जात आहे. भाजपा म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली.

पुढे उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलंत, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात? तुम्ही आगामी निवडणुकीत 400 पार होणार आहात ना? मग व्हा ना 400 पार, आता तर आम्ही बघतोच, तुम्ही 400 पार कसे होताय. माझ्या साध्या साध्या लोकांना पोलिसांतले जुने खटले काढून त्रास दिला जात आहे. जुनी प्रकरणं उकरून आयकर विभागाच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. परंतु, तुमच्याकडे जे टोणगे आलेत, जे बाजारबुणगे आलेत त्यांच्यावरील खटल्यांचं काय झालं? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे सरकारला थेट आव्हान दिले आहे.

🤙 9921334545