
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमल महाडिक यांनी आज हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, चंदूर, मुडशिंगी इत्यादी गावांचा दौरा केला. या गावातील राजाराम कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले, “कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं तसंच काहीसं विरोधकांचं झालं आहे. स्वतः स्वार्थाच्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे त्यांना सगळीकडे स्वार्थ दिसून येतो. कारखान्याचे सभासद याहीवेळेस त्यांना नाकारणार हे समजल्यामुळे आलेले नैराश्य विरोधक लपवू शकत नाहीत. या नैराश्येतुनच ते वक्तव्य करत असतात. पण जाईल तिथे जमिनी लाटण्याचा इतिहास असणाऱ्यांनी कारखान्याच्या सातबाऱ्याबाबत चिंता करू नये.” अशा शब्दात माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
“सातबारा नावावर करतील वगैरे बोलून सभासदांची दिशाभूल करू पाहणाऱ्यांना कदाचित याचा विसर पडला असावा. पण मागील 27 वर्षे आम्ही या कारखान्यात सहकार जपण्याचं काम केलेलं आहे, आणि इथल्या प्रत्येक सभासदाला त्याची जाणीव आहे. स्वतःच्या डी वाय पाटील कारखान्याचे सभासद रातोरात कमी करणाऱ्यांना आता सभासदांची काळजी वाटू लागली आहे. हे पूतना मावशीचे प्रेम सभासदही ओळखून आहेत. जिल्ह्यातल्या किती सातबारा उताऱ्यांवर तुमची नावं लागली आहेत हे जनतेला ठाऊक आहे. राजाराम कारखान्याचा सुज्ञ शेतकरी सभासद नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे आणि यापुढेही उभा राहील” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, मा.संचालक शिवाजी घोरपडे, माजी जि.प.सदस्य राजु मगदूम, बंडू भोसले, माजी पं.स. सदस्य महेश पाटील यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
