नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाच अनावरण आज (शुक्रवारी) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.
“आज भारतानं गुलामगिरीचं एक चिन्ह आपल्या छातीवरून उतरवून ठेवलं आहे. आजपासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. आज मी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो. मला विश्वास आहे की भारतीयत्वाच्या भावनेनं भारलेला हा नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.