करनूर:वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी दि. ३० शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी करणार आहेत. करनूर ता. कागल येथे ऊस शेतीमधील ए. तंत्रज्ञानावर चर्चासत्र होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट- पुणे व कृषी विज्ञान केंद्र- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या चर्चासत्रात ऊस पिकातील आधुनिक प्लॉट विकास, ए आय तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी युवराज पाटील, प्रताप ऊर्फ भैय्या माने, नविद मुश्रीफ हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
डॉ. तुषार जाधव हे “ऊस पिकात ए आय तंत्रज्ञानाचा वापर व महत्त्व”तर अरुण देशमुख हे “ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन” तसेच विनय पोळ हे “ए आय तंत्रज्ञानामध्ये जिवाणू खतांचे महत्त्व” या विषयांवर माहिती देणार आहेत.
दरम्यान, सकाळी १० वाजता प्रत्यक्ष ऊस शेतीमध्ये वापरलेल्या ए. आय. तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी शिवार फेरीने कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत चर्चासत्र होईल. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
