हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार : समरजितसिंह घाटगे


कागल (प्रतिनिधी) : सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार आहे. आणि मी आमदार म्हणजे कागलची जनताच आमदार होणार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ओबीसी आरक्षणसाठी, प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वीज बील सवलतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला. खेलो ईंडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कारखाना मानधनधारक धावपटू सागर शेळके याचा घाटगे यांनी सत्कार केला.

ते पुढे म्हणाले, कागलमधील दादागिरीची भाषा आता जनताच बंद करणार आहे. शासनाच्या योजना पारदर्शीपणे जनतेपर्यंत पोहोचवूया. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुणाच्या दबावाखाली राहू नये. त्यांना न्याय देऊ. संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या लाभार्थ्यांना विनाकपात संपूर्ण पेन्शन घरपोच देऊ. हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी किती वेळा चर्चा केली?आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागलमध्ये तीनवेळा आणले. मात्र अजित पवार यांनी त्यांना दोनवेळा कागलमध्ये येतो म्हणून टोलवले. यातच त्यांचे पक्षांमध्ये किती वजन आहे हे दिसून येते.

व्यासपिठावर आरपीआयचे प्रदीप म्हस्के, शिवगोंडा पाटील, पंडीत चव्हाण, पंडित पाटील, लक्ष्मीबाई सावंत,संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे, रमीज मुजावर, विलास कांबळे, अमन आवटे, अरुण गुरव, संदीप शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत उत्तम पाचगावे यांनी केले. प्रास्तविक प्रकाश पाटील यांनी केले. आभार हणमंत वड्ड यांनी मानले.

त्यांच्या व माझ्या खेट्यांतील फरक

विकास कामासाठीचा निधी थांबवण्यासाठी समरजितसिंह मुंबईला खेटे घालतात.या हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना घाटगे म्हणाले, विकास कामासाठीचा निधी थांबवणे आमचे संस्कार नाहीत. आम्ही कबूल करतो मुंबईला आम्ही खेटे घातले. परंतु ते तुम्ही न केलेल्या विकास कामासाठी. व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी.
मात्र तुम्ही मुंबईला खेटे घातले ते बगलबच्च्यांच्या प्लॉटिंगची मंजुरी व आरक्षणसाठी, नबाब मलिकांसाठी व ॲडव्हान्समध्ये केलेल्या कामाच्या मंजुरीसाठी. हाच तुमच्या व माझ्या खेट्यांतील फरक आहे.