कोरोनाकाळात मुंबई विमानतळाची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई : कोरोनाकाळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने कामगिरीचा आलेख कायम ठेवला आहे.

गेल्या वर्षभरात तब्बल ७.७ लाख टन मालाची हाताळणी करून विमानतळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये मालवाहतुकीत २८ टक्क्यांची वाढ नोंदविली. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये मुंबई विमानतळावरून एकूण ७.७ लाख टन मालवाहतूक केली. त्यापैकी २.१ लाख टन देशभरात, तर ५.६ लाख टन माल परदेशात पोहोचविण्यात आला. २०२० च्या तुलनेत देशांतर्गत मार्गावर ३० टक्के, तर आंतरराष्ट्रीय मार्गावरील मालवाहतुकीत २७ टक्के वाढ झाली आहे.वर्षभरात माल वाहतुकीसाठी १ लाख ८ हजार विमानांची मदत घेतली. २०२० च्या तुलनेत ही संख्या ३१ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत मार्गांवर वैद्यकीय नमुने, ई-कॉमर्सची सर्वाधिक हाताळणी झाली.