सहा हजार ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्रे…

मुंबई: तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आद्र्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार ही केंद्रे उभारण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

राज्यात सध्या मंडळस्तरावर दोन हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाची आक़डेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.