नेते-मंत्री रोजचं खोटं बोलतात, त्यांचं इतकं मनावर घेऊ नका : खा. संजय राऊत

मुंबई वृत्तसंस्था : मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसं म्हणायचं? निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे २०२१ सालातली उपाययोजना नव्हती आणि २०२२ मध्येही नसेल. मावळते वर्ष आणि नव्या वर्षात फरक करण्यासारखी परिस्थिती नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धोरणांवर निशाणा साधला आहे.

२०२१ सालात म. गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा धर्मसंसदेच्या नावाखाली जयजयकार केला. गांधींना शिव्या देणारे कुणी साधू कालिचरण हे महाराष्ट्रातले आहेत. भाजपानं या वृत्तीचा साधा निषेध केला नाही. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे, त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे. झाले ते पुरे झाले. २०२२ सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असं राऊत म्हणाले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असं खापर फोडून मोदी व सरकार १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झालं आहे. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती-बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत. आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत”, असं देखील राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.