कोल्हापूरच्या तरुणाची मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या !

कोल्हापूर : जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. २३ वर्षीय आकाश शांताराम बोराडे या तरुणाने राहत्या घरी फॅनला नायलॉन दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.

 

पोलिसांना मृत तरुणाच्या खोलीतून चार पानी चिठ्ठी देखील सापडली असून करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मित्र त्याला नेमका कशाचा त्रास देत होता, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शांताराम बोराडे (वय २३, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कातराबाद, ता. परांडा, जि. धाराशिव) हा आपल्या आई-वडिलांसह आर.के नगर सोसायटीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने राहत होता. तो कोल्हापुरातील के.आय.टी कॉलेजमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याचं कॅम्पस इंटरव्यूमधून एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून सिलेक्शन देखील झालं होतं.

आकाश मनमिळाऊ आणि हुशार स्वभावाचा असल्याने त्याची सर्वांसोबत चांगली वागणूक होती. मात्र गेल्या काही दिवसात तो तणावाखाली होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला कारण विचारल्यानंतर त्याने मित्राच्या त्रासाला कंटाळलो असल्याचं सांगितलं होतं. दिवसेंदिवस मित्राचा त्रास अधिक होत असल्याने आकाश बोराडे याने गुरुवारी रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.बराच वेळ आकाश बेडरूम मधून बाहेर न आल्याने आईने त्याला हाक मारली, मात्र आकाशने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आणि दरवाजा बंद असल्याने आकाशच्या आईने घर मालकाला बोलवून दरवाजा उघडला.

यावेळी आकाश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. संबंधित घटनेची माहिती त्वरित करवीर पोलिसांना कळवण्यात आली. करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.गळफास घेण्यापूर्वी आकाशने चार पानी चिट्ठी लिहून ठेवली होती, ती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचा ताबा घेऊन आई-वडील त्यांच्या मूळगावी धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शुक्रवारी आई-वडिलांचा जबाब घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

🤙 9921334545