“भाजप सरकार चायनीज मॉडेलवर चालतेय” : आदित्य ठाकरे

भाजप सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळ दाखवायला घाबरते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, या अमित शाहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  “आजची भाजपा ही जुनी भाजपा नाही. आजची भाजपा ही चायनीज मॉडेलवर चालत आहे. ज्या चीनला डोळे दाखवायला केंद्रातील मोदी सरकार घाबरते, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या सरकारडून सुरू आहे”.  अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली  आहे.

“भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य नाही. त्यांना लोकशाही मान्य नाही. आज देशातील महिला घाबरलेल्या आहेत. कर्नाटकातलं उदाहरण ताजे आहे. कर्नाटकमधील रेवन्ना प्रकरण भयंकर आहे. भाजपाने मुंबईतही अशाच एका उमेदवाराला तिकीट दिलं आहे”, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडली, कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. या आरोपालाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. “अमित शाह यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांना आरोपच करायचे असतील तर ते करू शकतात. पण शिवसेना का आणि कोणी फोडली, महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. आज बाहेरचे लोक येऊन असली शिवसेने आणि नकली शिवसेना कोणती हे सांगत आहे. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही”, असेही ते म्हणाले.