नवी दिल्ली: भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात आला आहे.सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल.
आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.