पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा ;२५ रुग्णांच्या दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या ८ ते १० रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले.

यावेळी ते पुढे म्हणाले, काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल २५ बायपास शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.

आपण नेहमी ह्रदयाच्या बायपास शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो. पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात बायपास शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल ८-१० ठिकाणीच होते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.

मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. यासाठी ह्रदयामार्फत प्रवाहित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे २५% रक्ताचा वापर मेंदूचे कार्य होण्यासाठी होतो. या रक्ताभिसरणासाठी कैरोटिड आर्टरी (धमनी) मोठ्या मेंदूला रक्त पुरवठा करण्याचे काम करत असते तर व्हर्तेब्रल आर्टरी (धमनी) लहान मेंदूला रक्त पुरवठा करत असतात. त्या मेंदूमध्ये आत जावून अत्यंत जटील व अत्यंत लहान म्हणजेच केसाच्या तुलनेत दहापट लहान असतात. अनेक वेळा या रक्तवाहिन्यांच्याद्वारे रक्तपुरवठा करण्याचे बंद होते, रक्तवाहिन्या चोकअप होतात, अशावेळी अशी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आपण यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारे या शस्त्रक्रिया करतो. यात पहिल्या प्रकारात रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हाताच्या भागातून रक्तवाहिनी काढून (रेडीयल आर्टरी) मानेच्या भागापासून नवीन वाहिनी घालून मेंदूला पुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी सोबत जोडली जाते. यासाठी साधारणत: २० सेंटीमीटर इतका धामानीचा भाग शरीराच्या इतर भागातून वापरली जाते. दुसऱ्या प्रकारात कानाच्या जवळून (इथे आपल्याला अनेक वेळा ठोके जाणवतात) केसाच्या खालील भागातून शस्त्रक्रिया करून धमनी काढून मेंदूच्या मुख्य धमनीला जोडली जाते. यात साधारणत: ८ सेंटीमीटर धमानीचा भाग वापरला जातो. या प्रकारच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया करत असताना आपल्या डोळ्यांना हि न दिसणाऱ्या अनेक लहान रक्तवाहिन्या असतात, त्यांना कोणतीही इजा न करता तसेच मेंदूच्या इतर कोणत्या हि भागाला दुखापत न करता शस्त्रक्रिया करायच्या असतात. या वाहिन्यांचा आकार सुमारे १ ते २ मिलीमीटर इतका सूक्ष्म असतो, त्यामुळे अत्यंत अत्याधुनिक अशा मायक्रोस्कोपच्या द्वारेचे हि शस्त्रक्रिया करता येते. लहान क्लिपद्वारे मेंदूतील रोग ग्रस्त धमनी दोन्ही बाजूने बंद केली जाते. मेंदूचा रक्तपुरवठा हा पुरवठा केवळ आपण १५ मिनटांच्या करीतच बंद करू शकतो, कारण यापेक्षा जास्त वेळ लागला तर पेशंटला कायमचा लकवा मारण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यायी धमनी १५ मिनिटांच्या आत या भागात जोडावी लागते.

यावेळी बोलताना काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “मेट्रो शहरात होरणाऱ्या या शस्त्रक्रियेला तब्बल १० ते १५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहेत, मात्र सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्यावत तंत्रज्ञान वापरून हि न नफा न तोटा या तत्वावर केवळ गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा म्हणून नाममात्र खर्चात हि शस्त्रक्रिया होत आहे. समाजातील गरजू व गरीब लोकांच्याकरिता आपण हि माहिती आपल्या माध्यमातून पोहचवावी व या सेवेचा लाभ त्यांना द्यावा. ”

यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध यांनी सांगितले कि, डॉ. शिवशंकर मरजक्के हे ब्रेन बायपास, एपिलेप्सी सर्जरी, एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी करण्यासाठी भारतातील काही मोजक्या (८-१०) सर्जनांपैकी एक असून त्यांनी सर्वोत्तम न्यूरो इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्जरी क्षेत्रात दोनदा सुवर्णपदक प्राप्त केले असून तब्बल 10000 पेक्षा जास्त गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे. गेली १० वर्षे सिद्धगिरीत सेवा देत असून रुग्णांनी त्यांच्या कौशल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, न्युरोसर्जन डॉ.आविष्कार कढव, डॉ.निषाद साठे, डॉ.स्वप्नील वळीवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर आदी उपस्थित होते.

🤙 9921334545