बंद झालेली पेन्शन पूर्ववत होणार सुरू : प्रताप उर्फ भैय्या माने

(कोल्हापूर) : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विधवा व दिव्यांग लाभार्थींची मुले २५ वर्षाची झाल्यामुळे बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होणार आहे. कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी ही माहिती दिली.

विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतल्यामुळे मुश्रीफ यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या मुलांना नोकरी लागेपर्यंत पेन्शन सुरू राहणार आहे. राज्यातील हजारो लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय गांधी निराधार योजनेतील विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची होईपर्यंत किंवा शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी मिळेपर्यंत ही पेन्शन मिळायची. यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थींना लाभ देण्यात यावा, असा शासन निर्णय होता.

ही जाचक अट रद्द करण्यासाठी आमदार राजेश पाटील, कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने, प्रविण भोसले, सदाशिव तुकान, राजू आमते, शशिकांत खोत, नारायण पाटील, साताप्पा कांबळे यांनी पाठपुरावा केला. श्री. मुश्रीफ यांनी शासन निर्णयात बदल करून संजय गांधी निराधार योजनेतील विधवा व दिव्यांग लाभार्थींच्या मुलांची २५ वर्षाची अट रद्द केली.

तसेच दिनांक ०५/ १०/ २०२३ चे शासन परिपत्रक काढून दिनांक ०१/०४ /२०२२ पासून ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थींची मुले २५ वर्षाची झाले कारणाने अनुदान बंद करण्यात आलेले आहे, अशा लाभार्थींचे मुळ प्रस्ताव (पूर्वी केलेले अर्ज) ग्राह्य धरून सदर लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिलेले आहेत. तसेच; ०१/०४/२०२२ पूर्वी ज्यांचे वरील कारणास्तव अनुदान बंद झाले आहे, त्यांनी आपले नवीन अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन माने यांनी केले आहे.

🤙 9921334545