
कोल्हापूर : शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढत राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार डी एड, बि. एड. धारकांना तात्काळ नेमणूका देण्याचे व याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करण्या बाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे सेवानिवृत्त कर्मचारी हा वयोमानानुसार निवृत्त होत असतो, वयोमान झाल्यामुळे कार्य करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये नसते तर काही कर्मचारी विविध वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती घेत असतात, निवृत्तीच्या काळात त्यांना शासन योग्य ते निवृत्तीवेतन देत असते त्यामुळे त्यांनाच पुन्हा नियुक्ती देणे उचित नाही. जे सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आहेत ते गरजवंत असतात व कामाच्या शोधात असतात त्यामुळे मिळेल त्या कामाला योग्य न्याय देण्याचा ते प्रयत्न करू शकतात करिता या बेरोजगार युवकांकडे शासनाने आणि प्रशासनाने लक्ष देऊन त्यांनाच तात्पुरत्या नियुक्त्या द्याव्यात. याविषयी शासन व प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण संघटना करणार आहे प्रसंगी योग्य तो लढा पुकारून बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे असे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी या निवेदनातून सांगितले आहे.
राज्य सरचिटणीस हरीश ससनकर , महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, महिला जिल्हाध्यक्षा विद्या कदम, सरचिरणीस अलका थोरात, जिल्हा नेते शंकर पवार, जिल्हाध्यक्ष एस के पाटील, सरचिटणीस तुषार पाटील यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
