
मुंबई : नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीची दहशत दाखवण्यात आली.शिवकुमार यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं होतं. या सगळ्यांना न जुमानता कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे हुकूमशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे”, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

निकालावर राज्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारलं असता फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. “देवेंद्र फडणवीस यांचा गोंधळ मी समजू शकतो. ते ज्यांच्या संगतीला आहेत त्यांना राजकारण काही कळत नाही. ढेकणं संगे हिरा भंगला असं म्हणतात. तसा हा हिरा ढेकण्याच्या नादाला लागून भंगलाय”, असा टोला राऊतांनी लगावला.
