
कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर केलेल्या दगडफेकीनंतर दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते.दगडफेकीच्या याघटनेनंतर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात येताच अखेर ७२ तासानंतर ही बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. सीमावाद उफाळून आल्यानंतर एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून जाणाऱ्या ३३० आणि येणाऱ्या ३३० अशा ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मात्र परिस्थिती पुर्वपदावर येताच कोल्हापुरातून ७२ तासानंतर बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली. सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली.
