कोल्हापूर : राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा आव आणणाऱ्यांची लगेचच फजिती होते, अशा अर्थाचं तुकोबांचा एक अभंग ट्विट करत संभाजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll अशा ट्विट करत संभाजीराजेंनी केलं आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणत स्वाभिमान राखण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.
या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता, मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्विट हे निश्चितच वास्तविकता दर्शवित आहे.